शेतातील घर (भाग १)- भयकथा

माझी बारावीची परीक्षा संपली होती. आणि मी एकदाचा निःश्वास सोडला. आता मला ओढ लागली होती ती आमच्या गावी जायची. गाव म्हंटले की गावाकडचे मित्र मैत्रिणी, त्यांच्या बरोबर रात्रभर चालणाऱ्या गप्पा गोष्टी, मस्ती, आमचे गावाकडले शेत आणि शेतातील घर.

गेले दोन वर्षे माझ्या कॉलेज मुळे आम्हाला गावी जात आले नव्हते. माझ्या शिक्षणामुळे माझ्या बाबांनी पण त्यांची बदली गावातील शाळेतून शहरातल्या शाळेमध्ये करून घेतली. त्यामुळे या वर्षी कधी एकदा गावी जातो असे झाले होते. परीक्षा आटोपल्यावर पुढच्या आठवड्यात आम्ही गावी जायचे पक्के केले. माझे आई बाबा, काका काकू, त्यांचा मुलगा व मुलगी, माझी ताई, घरचे सगळे आम्ही एकत्र च गावी जायला निघालो.

आम्ही 2 वर्षांनी आम्ही गावी जात होतो दहावीचे पेपर झाल्यावर नंतर अकरावीचे ऍडमिशन साठी जेव्हा शहरात आलो ते बारावीचे पेपर झाल्यावरच गावाकडे निघालो होतो त्यामुळे काय नवीन पाहायला मिळेल याची उत्सुकता मला जास्त होती. संपूर्ण पाच सहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही एकदाचे गावी पोहोचलो. गावाकडचे वातावरण पाहून मन कसं तृप्त झालं. सुरुवातीचे दिवस मित्रांसोबत खेळण्यात व फिरण्यात अगदी मजेत गेले. पण नंतर गावाकडे आलो आहोत तर नवीन काहीतरी करूयात याचा विचार करू लागलो.

त्या दिवशी सगळ्यांनी ठरवले की आमच्या घरा पासून काही अंतरावर असलेल्या आमच्या शेतातील घरी जायचे. ठरल्या प्रमाणे मी, काका, माझा मित्र आणि आमच्या घरी असलेला आमचा टॉमी असे आम्ही जाऊन संध्याकाळी परत येऊ असे घरी सांगितले. पण आजी आजोबांनी मात्र ठामपणे नकार दिला. मी खूप हट्ट केला, काका पण म्हणत होता जाऊ दे ना दादा एक दोन तासात येतो माघारी आम्ही. तरीही ते ऐकत नव्हते. कारण विचारल्यावर ते चिडून म्हणाले,

आजोबा: नाही जायचे बोलतोय ना एकदाच.. मग नाही जायचे..

एवढे बोलून ते पारावर बसायला निघून गेले. आजी पण बडबड करत तिथून निघून गेली. शेवटी आई ला सांगून आम्ही तिथे जायला निघालो. शेत तस घरा पासून बराच लांब होत म्हणून काका ने जुनी सायकल काढली आणि मित्रांने त्याची सायकल घेतली मी जवळपास २ वर्षांनी सायकल वर बसत होतो त्यामुळे खूप छान वाटत होत. साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही शेतातील घरी आलो. जेवण वैगरे घेऊन च निघालो होतो. तिथे गेल्यावर मस्त जेवलो, गप्पा झाल्या. आमच्या शेतात फेर फटका मारे पर्यंत संध्याकाळ होत आली.

आजोबांना कळण्या आधी आपण घरी पोहचायला हवे असा विचार करून आम्ही निघायची तयारी केली. सूर्य मावळतीला जाऊन हळु हळू अंधार पडायला सुरुवात झाली होती. काका म्हणाला की चला लवकर, आपल्याला निघायला हवे आता. आजोबांना कळले की आपण इथे आलो आहोत तर आपली काही खैर नाही. आमचे शेत मुख्य रस्त्यावर पासून बराच आत होत आणि त्याला जोडणारा रस्ता ही अगदी खराब होता. शेतात जाणारा रस्ता ओढ्याने असल्यामुळे कच्चा रस्ता होता. रस्त्याच्या बाजूला इथून तिथून मुख्य रस्त्यापर्यंत सगळे झाडे झुडपे होती. मी या आधी त्या भागात रात्र होई पर्यंत कधी थांबलो नव्हतो त्यामुळे मला वेगळच वाटत होते. त्या ओढ्यातून जाताना भयान शांतता होती परिसर अगदीच निर्मनुष्य वाटू लागला. पण आम्ही तिथे एकत्र होतो त्यामुळे इतके काही वाटले नाही. काका पुढे सायकल चालवतात मी काकाच्या पाठीमागे बसलो होतो तर मित्र त्याची सायकल माझ्यासोबत गप्पा मारत चालवत होता त्या शांत वातावरणात सायकल चा तो आवाज आज मात्र वेगळाच जाणवत होता. शेतापासून थोडे अंतर लांब आलो असू, तितक्यात काकाने ओरडुन सांगितले “कोणीही मागे बघू नका..” अचानक तो सायकल पळवू लागला. मला वाटले की काका उगाच आपली चेष्टा करत असणार म्हणून मी त्याला म्हणालो “काका, का मोकळ्यात घाबरतोय आम्हाला..”

मी त्याला हे बोललो खरे पण मला अचानक वातावरणात गारवा वाटू लागला. एप्रिल महिन्यात ले दिवस होते आणि त्यात हा असा गारवा. मला आश्चर्य च वाटले. काका ला नक्कीच काही तरी विचित्र जाणवले होते हे मला कळून चुकले. आमच्या सोबत आलेला आमचा टॉमी पण घाबरून आमच्या सायकल बरोबर पळत होता. हे सगळे पाहून आता आम्हाला ही भीती वाटू लागली होती. मी काका ला काही विचारणार तितक्यात तो पुन्हा म्हणाला “काहीही झाले तरी चुकूनही मागे बघू नका..” मला त्याच्या आवाजातली भीती अगदी स्पष्ट जाणवू लागली. तो सायकल अतिशय जोरात पळवू लागला. काका ला इतके घाबरलेले पाहून आम्ही सुद्धा पुरते घाबरून गेलो होतो. तितक्यात आम्हाला ला मागून कोणी तरी ” वाचवा, वाचवा, मला वाचवा ” अशी हाक दिल्यासारखे वाटले. मी मागे वळून पाहणार तितक्यात माझ्या मित्र मला मोठ्याने थांब म्हणाला त्याने सायकल माझ्या जवळ घेतली आणि मला सावध करत हळूच म्हणाला “ती मला सुद्धा हाक मारत आहे, मागे वळून पाहू नकोस..” तो खोटं बोलत नव्हता कारण मला जी हाक ऐकू आली ती एका स्त्री च्या आवाजातली होती.

आम्ही तिघे ही प्रचंड घाबरलो होतो. काका फक्त एकच बोलत होता, मागे बघू नका. तो आवाज आता हळु हळू जवळ येऊ लागला. मला काय करावे काही सुचत नव्हते. कधी एकदा मुख्य रस्त्याला लागतो असे झाले होते. तितक्यात एक भयानक गोष्ट मला जाणवू लागली.. आमच्या सोबत आमच्या तिघा शिवाय अजुन कोणी तरी सायकल वर आहे. नुसत्या कल्पनेने माझ्या अंगावर सरसरून काटा येऊन गेला. आज काही आपण जिवंत घरी जाणार नाही असा विचार मनात येऊ लागला. मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही खूप घाबरलो होतो आमच्या हात पाय थरथर कापत होते. मनात देवाचा धावा करत होतो. कोणी तरी मागून मला सतत हाका मारून बोलवत होत. मी काका कडे पाहत विचारले “काका.. हा काय प्रकार आहे”. त्याने माझ्याकडे पहिले पण तो एकही शब्द बोलला नाही. त्याचे न बोलणे मला बरेच काही सांगून गेले. माझा मित्र त्याला सायकल अजुन जोरात पळवायला सांगत होता. काही अंतर कापल्या नंतर आम्हाला मुख्य रस्ता दृष्टीस पडू लागला. तसे तो आवाज ही हळु हळू धूसर होऊ लागला.

असे वाटू लागले की ते जे काही होते ते आता मागे पडले आहे. शेवटी आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. आम्ही जे काही अनुभवले होते त्या नंतर अजुन ही मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती. घरी पोहचेपर्यंत आम्ही कोणीच कोणाशी काही बोललो नाही. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा काका म्हणाला की आपल्या सोबत जे घडले ते घरी चुकूनही कोणाला सांगू नका. ही घटना म्हणजे आपल्याला पडलेले एक स्वप्न होतं असे समजून सगळे विसरून जाऊ. पण माझ्या मनाला कितीही समजावलं तरी माझं मन शांत होत नव्हतं माझ्या मनात पुन्हा पुन्हा तोच विचार येत होता की,

“ती बाई कोण होती ?”

नक्की काय घडलं होतं तिच्यासोबत ती आम्हाला हाका मारत होती हे सगळ्या विचारांनी माझ्या मनात गोंधळ मांडला होता मला शेवटी राहवलं नाही मी आजोबांना विचारलं हा प्रकार काय आहे

आजोबा, “ती बाई कोण होती?. ती आम्हाला हाका का मारत होती?”

आजोबा आम्हाला खुप ओरडले. आम्ही सगळे शांत झालो. नंतर दोन दिवसांनी मी त्यांना पुन्हा विचारले. मी त्यांना चार-पाच वेळा विचारल्यावर शेवटी त्यांनी मला हा सगळा प्रकार सांगितला…

ती स्त्री कोण होती. तिच्या सोबत नक्की काय घडले ते आजोबा सांगू लागले…

क्रमशः

इतर कथा

Leave a Comment